कर्नाटक-महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्नी सल्ला देण्यासाठी नेमलेल्या तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातला ठराव महाराष्ट्र सरकारने 24 मे रोजी केला असून शासनाचे उपसचिव ज जी जवळी यांनी हा नियुक्ती बाबत अधिकृत आदेश बजावला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने या समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. नुकतेच बेळगावच्या दौऱ्यावर आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत ज्योती कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीत समिती नेत्यांनी शरद पवार याना याबाबत विनंती केली होती. त्यानंतर ही मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली असून जयंत पाटील यांच्याकडे आता बेळगावची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
सीमालढ्याचे आधारस्तंभ आणि माजी मंत्री कै. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर तज्ञ समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते त्या जागी जयंत पाटलांची नियुक्ती करा अशी मागणी मध्यवर्ती समितीने महाराष्ट्र शासनाकडे पत्र लिहूनदेखील केली होती.
सहा जणांच्या तज्ञ समितीत जयंत पाटील यांना अध्यक्षपद देण्यात आले असून या समितीमध्ये सदस्य म्हणून मूळचे बेळगावचे असलेले महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर तसेच जेष्ठ वकील राम आपटे या दोघा बेळगावकरांचा ही समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्य अप्पर सचिव असणार आहेत. तर विशेष निमंत्रित म्हणून वकील र. वी. पाटील आणि महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव वरिष्ठ सल्लागार दोघे असणार आहेत.
12 फेब्रुवारी 2002 मध्ये एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सहा सदस्यीय समिति नियुक्त करण्यात आली होती. आता एन डी पाटील यांच्या निधनानंतर सदर समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर चे आहेत ते नेहमीच ते बेळगावातील समितीच्या नेत्यांच्या संपर्कात असतात सीमा प्रश्नी त्यांची नेहमी तळमळ असते तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपद त्यांना दिल्याने आता सीमाप्रश्नाच्या लढ्याला एक प्रकारे बळकटी आणि चालना मिळणार आहे.
बेळगाव सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात दावा दाखल करण्यात आलेला आहे त्यात दाव्या संबंधी बैठका घेणे बेळगाव प्रश्नी महत्वाचे निर्णय घेण्याचे काम ही तज्ञ समिती करत असते.


Recent Comments