ऊसाला प्रतिटन ६,५०० रुपये दर निश्चित करावा या मागणीसाठी शेतकरी नेते शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास २३ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अथणी तालुक्यातील अवरखोड गावात बोलताना शेतकरी नेते शशिकांत गुरुजी यांनी, बाजारात साखरेचे दर आणि शेतीचा उत्पादन खर्च वाढूनही त्याचा आर्थिक फायदा ऊस उत्पादकांना मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खते, युरिया, पेरणी, कापणी आणि वाहतूक खर्च दरवर्षी वाढत असून, सध्या लागू असलेले एफआरपी आणि एमएसपी दर शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष खर्च भागवण्यात अपुरे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सरकार आणि साखर कारखान्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे सांगत येत्या २३ सप्टेंबर रोजी एक लाख ऊस उत्पादकांसह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासाला घेराव घालणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील ऊस उत्पादक कुटुंबांच्या आर्थिक हितासाठी सरकारने तातडीने दराची घोषणा करावी, असे शशिकांत गुरुजी यांनी म्हटले.


Recent Comments