State

दलित आणि आदिवासी असल्यामुळेच राजीनाम्याची मागणी; मंत्री बी. नागेंद्र

Share

वाल्मिकी विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजप करत असलेल्या आंदोलनावर क्रीडा व युवा सक्षमीकरण मंत्री बी. नागेंद्र यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसौध येथे पत्रकार परिषदेत बोलताना बी. नागेंद्र यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील एकही पैसा त्यांच्या खात्यात आलेला नाही. ईडीने चौकशी दरम्यान प्रमुख नेत्यांची नावे सांगण्यासाठी आपल्यावर अनावश्यक दबाव आणून कारवाई केली होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसताना आपण दलित आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतो, याच कारणास्तव राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपल्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विरोधी पक्षातील अनेक खासदार आणि आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांचा राजीनामा मागितला जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासह देशातील अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल असताना भाजप गप्प आहे. केवळ आदिवासी समाजाचा नेता असल्याने आपल्याला पदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू असून, हा सर्व प्रकार वाल्मिकी व दलित समाज बारीक नजरेने पाहत आहे, अशी प्रतिक्रिया बी. नागेंद्र यांनी दिली.

आपण कोणताही दबाव आणून मंत्रीपद मिळवलेले नसून, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासावर ही जबाबदारी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील दुष्काळ आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा न करता भाजप केवळ राजकीय फायद्यासाठी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत आहे. संविधान हेच आपले रक्षणकर्ते असून न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर करतो, असे प्रतिपादन बी. नागेंद्र यांनी केले.

Tags: