राज्यातील संभाव्य मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडींवरून विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेस सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसमध्ये केवळ ‘ड्रायव्हर’ बदलत असून, त्यांच्या संपूर्ण राजवटीत व्यवस्था पूर्णपणे हदगळली असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्याच्या सध्याच्या दुरवस्थेला सिद्धरामय्या हेच थेट जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना आर. अशोक यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडाडून टीका केली. सिद्धरामय्या यांनी कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय अर्थसंकल्प सादर करून संपूर्ण राज्याला ७.६४ कोटी रुपयांच्या प्रचंड कर्जाच्या खाईत लोटले आहे, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कंत्राटदारांची देयके देण्यासाठीही सरकारकडे पैसे उरलेले नाहीत. दरवर्षी तब्बल ३८ हजार कोटी रुपये केवळ व्याजापोटी दिले जात आहेत. हमी योजनांसाठी ६५ कोटी रुपये खर्च करणारे सरकार विकासात्मक कामांसाठी मात्र केवळ ८४ कोटी रुपये वापरत आहे, अशी आकडेवारी त्यांनी मांडली. सिद्धरामय्या यांनी राज्याला ७५ हजार कोटी रुपयांच्या थकीत बिलांची ‘भेट’ देऊन अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या सरकारमधील सर्वच मंत्री आपली खाती सांभाळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाची कामगिरी शून्य आहे. हे सर्वजण केवळ हाय कमांडचे ‘एटीएम’ म्हणून काम करत आहेत. सिद्धरामय्या आता समन्वय समितीच्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च पदाची मागणी करत आहेत. काँग्रेसच्या उर्वरित कार्यकाळात भ्रष्टाचार दुप्पट होणार असून, बंडखोर आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाईल. या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असून, आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत नागरिक या सरकारला मुळासकट उपटून टाकतील, असा दावा आर. अशोक यांनी केला.


Recent Comments