Bagalkot

हिप्परगी बॅरेजचा दरवाजा तुटल्याने कृष्णा नदीचे पाणी वाया

Share

बागलकोट जिल्ह्यातील रबकवी बनहट्टी तालुक्यातील हिप्परगी बॅरेजच्या २२ क्रमांकाच्या दरवाजाची प्लेट तुटली आहे. गेल्या ४० तासांपासून धरणातून पाणी सतत वाहत आहे. बॅरेजमधील ६ टीएमसी साठ्यापैकी तब्बल २ टीएमसी पाणी आधीच वाया गेले आहे.

दरवाजाची प्लेट वाकल्याने ती बाहेर काढण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. पाण्याचा प्रचंड दाब असल्याने दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जमखंडी आणि बनहट्टीचे तहसीलदार तसेच पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तेरदाळचे आमदार सिद्धू सवदी यांनीही भेट देऊन कामाचा आढावा घेतला. दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

उन्हाळा तोंडावर असताना पाण्याचा असा अपव्यय होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. हिप्परगी बॅरेज १२० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा मुख्य आधार आहे. बॅरेजमधील पाणी आटल्यास या परिसरात भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या तांत्रिक बिघाडाबाबत आणि संथ कामावर स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हिप्परगी बॅरेजचा दरवाजा तुटून तीन दिवस झाले तरी दुरुस्ती न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी संगप्पा आणि आमदार सिद्धू सवदी यांनी घटनास्थळी पाहणी केली, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कामात अडथळे येत आहेत. आज संध्याकाळपर्यंत दुरुस्ती न झाल्यास ३ टीएमसी पाणी वाया जाऊन १२० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवेल. प्रशासनाच्या दिरंगाईवर संताप व्यक्त करत आमदारांनी तातडीने काम पूर्ण करण्याची आणि दर पाच वर्षांनी दरवाजे बदलण्याची मागणी केली आहे.

Tags: