अनेक वाद-विवादांमुळे चर्चेत असलेला बेळगावमधील अमननगर उड्डाणपूल अखेर रद्द करण्यात आला आहे. उड्डाणपुलाऐवजी आता भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा पूल रद्द करण्यासाठी प्रयत्न केलेल्या आमदार आसिफ सेठ यांचा स्थानिकांनी सत्कार करून आभार मानले आहेत.

बेळगावच्या अमननगरमध्ये उड्डाणपूल बांधण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. नगरसेवक अझीम पटवेगार यांनी अमननगर आणि गांधीनगरमधील लोकांना होणाऱ्या संभाव्य अडचणी आमदारांच्या लक्षात आणून दिल्या होत्या आणि उड्डाणपूल न बांधण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने आता उड्डाणपुलाचे काम थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर, न्यू गांधीनगरमधील नागरिकांनी आमदार आसिफ सेठ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि आभार व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक अझीम पटवेगार म्हणाले, “अमननगरमधील उड्डाणपुलामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या आम्ही आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. आता जिल्हा प्रशासनाने उड्डाणपुलाचे काम थांबवण्याचा घेतलेला निर्णय आनंददायी आहे.”
यावर बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले, “अमननगरमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले होते. जेव्हा या पुलाची लांबी आणि रुंदी लोकांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांना समजले की यामुळे अमननगर आणि न्यू गांधीनगरमधील लोकांना त्रास होईल. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री यांच्यासोबत यावर चर्चा केली. उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्ग बांधल्यास कुणालाही त्रास होणार नाही, हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले. यावर जिल्हा पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीही जनतेच्या मागणीनुसार २० फुटांचा भुयारी मार्ग बांधण्यास परवानगी दिली आहे.”


Recent Comments