बागलकोट जिल्ह्यात, चालुक्यांच्या १२0 हून अधिक ऐतिहासिक स्मारकांना आपल्या उदरात सामावून घेणारे ऐहोळे गाव, आता स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, गेल्या एका दशकापासून ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण झालेली नाही, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे.

ऐहोळे गावामध्ये चालुक्यकालीन १२0 हून अधिक स्मारके आहेत. याच गावात ८00 हून अधिक घरे असून, ती आता जीर्ण झाली आहेत. पुरातत्त्व विभागाने घरांच्या नूतनीकरणाला किंवा दुरुस्तीला परवानगी दिली नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. स्मारकांच्या संरक्षणासाठी सरकारने हे गाव स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला खरा, पण ही प्रक्रिया अजूनही रखडलेली आहे.
सरकारच्या या भूमिकेमुळे ऐहोळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या पहिल्या टप्प्यात १२0 घरांचे स्थलांतर करण्याची सरकारची तयारी आहे, परंतु सर्व ८00 घरांचे एकाच ठिकाणी स्थलांतर करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांना स्थलांतराचे आश्वासन दिले होते. मात्र, इतका काळ उलटूनही अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. पावसाळ्यात ग्रामस्थांच्या घरांना गळती लागली असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे स्थानिक नागरिक केंद्र आणि राज्य सरकारवर आपला संताप व्यक्त करत आहेत.
Recent Comments