40 टक्के कमिशनचे सरकार अशी प्रतिमा बनलेल्या भाजप सरकारला जनता विटली आहे. जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटकात सत्तेवर येईल. त्याचबरोबर बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट चंद्रहास अणवेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलावून दाखविला.
यावेळी पुढे बोलताना अणवेकर म्हणाले, काँग्रेस पक्ष लोकशाही मूल्यावर आधारित पक्ष आहे. देशाला बळकट बनविणे, देशातील जनतेच्या हिताचे कार्य करणे हेच काँग्रेस पक्षाचे मूळ ध्येय आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने गोरगरीब आणि युवकांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला आहे. 40% कमिशनचे सरकार म्हणून भाजप सरकारची ओळख झाली आहे. जातिवादाला खतपाणी घालण्याचे काम भाजप करत आहे. यामुळे देशाची आणि राज्याची प्रगती खुंटली आहे असा आरोप ही अणवेकर यांनी केला.
गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात भाजप सरकारने राज्यात व्यापारी, उद्योजकांसमोरील अडचणी वाढविल्या आहेत. स्मार्टसिटीचे काम अंदाधुंदपणे सुरू आहे. अशावेळी जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या आहेत. काँग्रेस स्वबळावर सत्तेवर येईल याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळेच अन्य पक्षातील आमदार, कार्यकर्ते काँग्रेस पक्षात येऊ लागले आहेत.
काँग्रेसचे नेते आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्या कुशल नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने बेळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे कार्य केले आहे. जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसने वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळणार आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस पक्षाला विजयाची खात्री आहे. या मतदारसंघातून मी स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मात्र उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. पक्षश्रेष्ठी ज्याला उमेदवारी देतील त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार आहोत असेही अणवेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुर्गेश करगणगी आणि एडवोकेट एस. बी. बुदिहाळ उपस्थित होते.


Recent Comments