Belagavi

काही वाचले नसताना आणि काही पाहिले नसताना निषेध नोंदवीणे चुकीचे

Share

समाज एका रात्रीत सुधारत किंवा बिघडत नाही. काही चित्रपटांच्या विरोधात सुरू असलेला हॅशटॅग बैन प्रकार निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा एक प्रकार आहे. काही वाचले नसताना आणि काही पाहिले नसताना निषेध नोंदवीणे चुकीचे आहे. वाचा पहा आणि मगच काय ते बोला. असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी रोहिणी हट्टंगडी बेळगावला आल्या आहेत. यानिमित्ताने त्यांच्याबरोबर रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांबद्दल मनमोकळी चर्चा करता आली . सध्या चर्चेचा मुद्दा असलेल्या चित्रपटावरील हॅशटॅग बैन विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, पंचवीस वर्षांपूर्वी समलैंगिकतेवर आधारित एका नाटकात मी भूमिका साकारली होती. त्यावेळी समलैंगिक विषयावर कोणीच विरोधात बोलले नाही. मात्र फायर चित्रपटावर मात्र बैन लावण्यात आला.

बैन नावाचा प्रकार केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार आहे.अशा प्रकारातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात फुटेज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.एखाद्या वाक्याचा विषयाचा संदर्भ जाणून घेतल्याशिवाय त्याला वादग्रस्त बनविण्याचा चुकीचे आहे. त्या संदर्भावर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र काहीही वाचले नसताना,काहीही पाहिले नसताना होत असलेला निषेधाचा प्रकार निश्चितच योग्य नाही. असेही हट्टंगडी यांनी सांगितले. मराठी, हिंदी, गुजराती तामिळ व दक्षिणात्य चित्रपटांमधून काम केले. चित्रपट रंगभूमी आणि मालिकांमध्ये विविध प्रकारच्या अनेक भूमिका साकारल्या. मात्र अद्यापही शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित एकतर आव्हानात्मक भूमिका करण्याची इच्छा आहे.असेही त्यांनी सांगितले

बालरंगभूमीतून मी माझ्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. चित्रपटातील कामांमुळे नाटकांना खंड पडला. आजही वेळेचे नियोजन करून चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम करावे लागते.
तरुण पिढीला चित्रपट सृष्टीचे आकर्षण आहे. चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी पूर्वीच्या काळी अनेक जण घरची जमीन विकून यायचे. पडेल ते काम करायचे. अशी वाईट परिस्थिती होती. मात्र आज परिस्थिती बदलली आहे.चित्रपट सृष्टीत येऊ इच्छिणाऱ्यांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्यास हताश होऊ नये. आपला प्लॅन बी रेडी ठेवून अन्य क्षेत्रात काम करावे. आपली आवड कशात आहे ते ओळखा व त्या मागे लागा. प्रत्येक पिढी प्रगल्भ असते. त्यामुळे आजच्या पिढीनेही काम करताना प्लॅन बी तयार ठेवूनच चित्रपटसृष्टीत उतरावे असेही त्यांनी सांगितले.

आपल्या अभिनयाची सुरुवात बालरंगभूमीतून झाली. बालरंगभूमीला उत्तेजना देण्यासाठी,उन्हाळी सुट्टीत अभिनयाचे क्लास होणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत एक तासांची नाट्य कार्यशाळा व्हायला हवीत.असेही रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितले.

Tags: