बैलहोंगल तालुक्यातील चिकबागेवाडी येथील तलावात पाण्याची पातळी खालावल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू झाला असून तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पडला आहे.


बेळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याने जलस्रोत आटत असून याचा गंभीर परिणाम जलचरांवर झाला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून पाणी नसल्याने तलाव आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. चिकबागेवाडीमधील तलावात पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि हजारो मासे मृत्युमुखी पडले. तलावाच्या काठावर माशांचे ढीग साचले असून ही परिस्थिती पाहून स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून मत्स्यशेतीवर अवलंबून असलेल्या शंकरगौडा पाटील या शेतकऱ्याने यंदा या तलावात ५० हजारांहून अधिक मासे सोडले होते. लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून नफ्याची अपेक्षा असतानाच नैसर्गिक संकटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने माशांना हालचाल करण्यास जागा उरली नाही आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
हजारो माशांच्या मृत्यूमुळे मालक शंकरगौडा पाटील हे आर्थिक संकटात सापडले आहेत. गुंतवलेले भांडवलही हाती न आल्याने मोठे नुकसान झाले असून सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शंकरगौडा पाटील यांनी केली आहे.


Recent Comments