केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेवर जोरदार टीका केली. जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन राज्य सरकार जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोमन्ना म्हणाले की, बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी केवळ ५५ एकर जमिनीची आवश्यकता आहे. वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकार जमीन उपलब्ध करून देत नाही. जर अशीच टोलवाटोलवी सुरू राहिली, तर केंद्र सरकारला कायद्याचा आधार घेऊन कठोर पावले उचलावी लागतील. यावेळी त्यांनी ३२ कोटींचा देसूर-बेळगाव रेल्वे विकास, ४० कोटींचे सांबरा रेल्वे काम आणि खानापूर-देसूर प्रकल्पांचा आढावा घेतला.
या पत्रकार परिषदेला राज्यसभा सदस्य ईरण्णा कडाडी, माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार अरविंद पाटील आणि महांतेश कवटगीमठ यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments