बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता जिल्हा प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कुत्र्यांचे शहराबाहेर स्थलांतर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, या विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी श्वानप्रेमी आणि श्वान कल्याण समितीची विशेष बैठक बोलावली आहे.

बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून कालच आझाद नगरमध्ये एका दोन वर्षांच्या बालकावर कुत्र्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. अशा घटनांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कुत्र्यांच्या स्थलांतराबाबत तातडीने बैठक घेतली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सरकारी आदेशानुसार श्वानप्रेमींशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्रे उभारली असून तिथे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या २२,१३० कुत्र्यांचे वर्गीकरण करून त्यांना हिरेबागेवाडी येथील केंद्रात स्थलांतरित करण्याबाबत नियोजन सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.


Recent Comments