Belagavi

भूमी-वंचित मागण्या २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; कृषिक समाजाचा इशारा

Share

भूमी आणि निवाऱ्याच्या अधिकारांपासून तसेच कसण्याच्या वनहक्कांपासून वंचित असलेल्यांच्या मागण्या जर सरकारने पूर्ण केल्या नाहीत, तर २६ नोव्हेंबर रोजी ‘संयुक्त कर्नाटक वेदिके’च्या नेतृत्वाखाली बेंगळुरू येथील ‘फ्रीडम पार्क’मध्ये मोठे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती भारतीय कृषिक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी दिली.

आज बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी, कामगार, दलित, युवक आणि महिलांच्या संयुक्त आंदोलनाचे नेतृत्व ‘संयुक्त कर्नाटक वेदिके’ करणार आहे. या आंदोलनात, २६ नोव्हेंबर रोजी भूमी आणि निवाऱ्याच्या अधिकारापासून वंचित असलेल्यांसाठी भूमी सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्यातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांची सुपीक जमीन ताब्यात घेणे थांबवावे, कॉर्पोरेट धार्जिणे कायदे रद्द करावेत, भूमिहीनांना निकषांनुसार जमीन उपलब्ध करून द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, मक्याला हमीभाव , उसाला एफआरपी तसेच वेळेनुसार शेतमालाचे दर निश्चित करावेत. अशा प्रमुख १५ मागण्यांसाठी हा आग्रह धरण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले.

यावेळी एका अन्य प्रमुख कार्यकर्त्याने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावीत. २६ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कुमार, गीता धरेन्नवर, संजय डोंगरागांवी, के. मरेयप्पा आणि यासीन मकानदार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: