Kagawad

उगारमधील मल्लिकार्जुन गुरुदेव आश्रमाचा वर्धापन दिन उत्साहात

Share

उगार येथील मल्लिकार्जुन गुरुदेव आश्रमाचा २५ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकां पाद्यपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणासोबतच संस्कारांची सांगड घालून युवकांनी पालकांची सेवा करावी, असा मोलाचा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.

डॉ. प्रभाकर कोरे यांनी आई-वडिलांना मुलांचे पहिले गुरू मानून त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी पालकांविषयी कृतज्ञता आणि सेवाभाव जपला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या तीन दिवसीय सत्संग कार्यक्रमात बुधवारी ‘मातृ-पितृ भक्ती सेवा’ या विषयावर प्रवचन झाले. ईश्वर स्वामीजींनी आपल्या प्रवचनात पालकांच्या अपार कष्टांची जाणीव करून दिली. ज्येष्ठांचा आदर आणि जबाबदारीची जाणीव हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मल्लिकार्जुन आश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी यांनी आश्रमाच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या २५ वर्षांपासून येथे गुरुकुल पद्धतीने मूल्यधिष्ठित शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या माता-पित्यांविषयी आदर आणि कृतज्ञता निर्माण करणे हाच या विशेष पादपूजन सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.

या सोहळ्याला हंचिनाळचे महेशानंद स्वामीजी, संगमेश्वर महास्वामीजी, सालोटगीचे सिद्धेश्वर गुरुदेवाश्रम स्वामीजी आणि चिक्कालगुंडी मठाचे शरणानंद स्वामीजी उपस्थित होते. आश्रमातील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पाय धुवून त्यांचे पूजन केले, हा क्षण सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला.

कार्यक्रमाला कागवाड तालुका साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवगौडा कागे, चिक्कोडी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन प्रकाश राजमाने यांच्या वतीने करण्यात आले होते.

Tags: