Belagavi

बेळगावमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही : जिल्हाधिकारी

Share

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिक आणि जनावरांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे.

बेळगावमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या नसल्याचे स्पष्ट केले. टंचाईच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली असून, संभाव्य पाणीटंचाई असलेल्या १२६ गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) नेतृत्वाखाली टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार खाजगी कूपनलिका देखील अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, असे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मुख्य धरणांमधील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेतला जात असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच, शहरी भागात खाजगी टँकरचालकांनी अव्वाच्या सव्वा दर आकारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.

Tags: