बेळगावमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या किल्ला तलावात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


बेळगावमधील ऐतिहासिक किल्ला तलावाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सांडपाणी थेट तलावात मिसळले आहे. या दूषित आणि विषारी पाण्यामुळे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसत आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

किल्ला तलावाच्या व्यवस्थापनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून तलावाचे पाणी दूषित झाल्याने जलचरांचा बळी जात आहे. शहरातील इतर उद्यानांप्रमाणेच या ऐतिहासिक तलावाचा विकास होणे गरजेचे आहे. येथील वॉकिंग ट्रॅकची देखील दुरवस्था झाली असून संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे गटारींमधील घाण पाणी थेट तलावात आल्याने हे जलचरांचे हत्याकांड घडले आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातून चालणे देखील कठीण झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने मृत मासे बाहेर काढून तलावाची स्वच्छता करावी, अशी विनंती बेळगावमधील नागरिक करत आहेत.


Recent Comments