Belagavi

अंतर्गत आरक्षण: चुकीच्या तरतुदींविरोधात बेळगावात बंजारा समाजाचे आंदोलन

Share

सरकारने जाहीर केलेल्या अंतर्गत आरक्षणाच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये बंजारा, भोवी, कोरम आणि कोरच समाजांच्या संघटनेने भव्य आंदोलन केले. अंतर्गत आरक्षणातून आपल्या समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत या चारही समाजांच्या संघटनेने बेळगावात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी प्रतिक्रिया देताना आंदोलकांनी सांगितले, “सरकारने केवळ ४३ जातींना भटक्या जमाती मानले आहे, हे चुकीचे आहे. एकूण ६३ जातींचा यामध्ये समावेश आहे. या सर्व जातींना सोयी-सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ज्यांना आधीच आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांना पुन्हा आरक्षण दिले गेले आहे, तर गरजूंना मात्र वंचित ठेवले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा अन्याय दूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

आंदोलकांनी सरकारवर जोरदार टीका केली. “राज्यातील या भ्रष्ट सरकारने १७ टक्के आरक्षण केवळ ५ टक्क्यांवर आणले आहे. यामुळे बंजारा, भोवी, कोरमा आणि कोरचा या समाजांवर अन्याय झाला आहे. सरकारने वेळीच योग्य पाऊल उचलले नाही, तर त्याला धडा शिकवला जाईल.”

बी.पी. लमाणी म्हणाले, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने या चारही समाजांसाठी मृत्युपत्र काढले आहे. ५९ जातींचा समावेश असलेल्या ६३ जातींना केवळ ५ टक्के आरक्षण दिले आहे. या अन्यायाविरुद्ध चारही समाज तीव्र आंदोलन करतील.”

प्रकाश राठोड म्हणाले, “सरकारने घेतलेला हा अशास्त्रीय निर्णय मागे घ्यावा. राज्य सरकार जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. सरकारने यात सुधारणा करावी.”

या आंदोलनात बंजारा, भोवी, कोरम आणि कोरच समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: