Belagavi

संततधार पावसाने बेळगावचे जनजीवन विस्कळीत

Share

गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बेळगावमधील विविध भागात समस्यांनी डोके वर काढले असून सदाशिव नगर भागात गटारातील पाण्याचा निचरा न झाल्याने गटारी तुंबून पावसाचे पाणी घरोघरी शिरले आहे.

बेळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक २५ मधील सदाशिव नगरच्या शेवटच्या बस थांब्याजवळील परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कचरा आणि घाणीमुळे गटारे तुंबली असून गटारातील पाणी घरासमोर साचून तळ्यासारखे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप त्रास होत आहे.

गटाराचे पाणी घरात शिरत असल्यामुळे वृद्ध नागरिकांना तर घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. ‘घरासमोर अशाप्रकारे पाणी साचले आहे की दुचाकी सोडाच, पण चालणेही अशक्य झाले आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन गटारे स्वच्छ करावीत’, अशी मागणी एका ज्येष्ठ नागरिकांनी केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर येऊन गटारे स्वच्छ करून द्यावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Tags: