पावसाळ्यात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड यांनी दिला आहे.

सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पावसाळ्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संतोष लाड यांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यासारख्या कठीण काळातही अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य जनस्नेही पद्धतीने बजावले पाहिजे. आपल्या विभागाच्या कर्तव्यापासून विचलित होऊ नये. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाल्यास, त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी निक्षून सांगितले.
मंत्री लाड यांनी हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केली की, शहरातील सुमारे २ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. प्रत्येक कामगाराला पाच मीटर रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी देऊन, दररोज १० किलोमीटरप्रमाणे संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी एक रोडमॅप तयार करावा. तसेच त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, त्यांनी सतर्क राहावे. लोक उतरणीच्या ठिकाणी, अनधिकृत जागेत किंवा अनधिकृत लेआउटमध्ये घरे बांधतात, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. नागरिकांना या समस्यांची जाणीव करून दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
धारवाड जिल्ह्यात आणि सर्व तालुक्यांमध्ये मिळून अंदाजे ६७ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणीच्या बियाण्यांच्या नुकसानीची पाहणी करून आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करून, त्यानंतर पुन्हा मदत म्हणून बियाणे वाटपासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील कोणत्याही समस्या असल्यास, त्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधावा. जर आम्ही पूरग्रस्त भागांना भेट दिल्यावर तेथे कोणताही अधिकारी अनुपस्थित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले. पावसाळा संपेपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने आपले मुख्यालय सोडू नये. सामान्य लोकांनी कधीही फोन केल्यास, अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य प्रतिसाद द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
आगामी प्रत्येक के.डी.पी. बैठकीत सर्व अधिकारी वर्गाने त्यांच्या संबंधित क्षेत्रातील ठिकाणे ओळखली पाहिजेत जिथे खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळा संपेपर्यंत अधिकाऱ्यांनी चोवीस काम करावे, असे मंत्र्यांनी जोर देऊन सांगितले. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवर तात्पुरती का होईना दुरुस्ती करून तात्काळ लोकांना मार्ग उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारती पावसामुळे गळत असल्यास, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवल्यास त्यांना कोणतीही अडचण झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री संतोष लाड यांनी बैठकीतच सर्व तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या पंचायत राज विकास अधिकाऱ्यांना मोबाईलवर फोन करून त्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली. मोबाईलवरून कॉल करत त्यांनी विचारले की, “तुम्ही कुठे आहात? तुमच्या गावात पावसाळ्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि सार्वजनिक समस्यांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत?” तसेच त्यांनी पावसाळा संपेपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आणि कोणतीही हानी होऊ नये यासाठी नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला कर्नाटक विधान परिषदेचे मुख्य सचेतक सलीम अहमद, आमदार एन. एच. कोनरेड्डी, जिल्हाधिकारी दिव्यप्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक गोपाल एम. ब्याकोड, हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
Recent Comments