Vijayapura

कृष्णा पाणीवाटपाचा तिढा: आलमट्टीच्या उंचीसाठी विजापुरात शेतकऱ्यांचा एल्गार

Share

कृष्णा पाणीवाटपाचा बृजेश कुमार आयोगाचा निकाल येऊन १५ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याउलट, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने पाणीवाटप व धरणाच्या उंचीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला आहे, तर महाराष्ट्रानेही यावर आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विजापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत. कृष्णा नदी पाणीवाटपाबाबत बृजेश कुमार आयोगाचा निकाल येऊन आता १५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, या निकालाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही, ज्याप्रमाणे कावेरी नदीला महत्त्व दिले जाते, तसे कृष्णा नदीला का दिले जात नाही, असा सवाल करत शेतकरी संतप्त झाले आहेत.

कृष्णा नदी म्हटलं की, उत्तर कर्नाटकातील जनतेची ती जीवनवाहिनी आहे हे लगेच आठवतं. अनेक जिल्ह्यांमधून वाहणारी ही कृष्णा नदी इथल्या लोकांसाठी जगण्याचा आधार ठरली आहे. पण, कधीकधी तिच्या पुरामुळे ही नदी का वाहते असा प्रश्नही पडतो. हि नदी भरघोस पीक देऊन शेतकऱ्यांना सुखावते देखील. अशा या कृष्णा नदीवर विजापूर जिल्ह्यातील आलमट्टी येथे बांधलेल्या जलाशयाची उंची वाढवण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे. पण, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांकडून ही उंची वाढवण्याला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी विजापूर जिल्ह्यातील आपल्या लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच आलमट्टी जलाशयाची उंची वाढवता येत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. १९७४ मध्ये धरणाची पायाभरणी झाली, पण अजूनही समस्या सुटलेली नाही. जलाशयाची उंची ५३४.२५६ मीटरपर्यंत वाढवावी अशी अनेकवेळा मागणी करूनही ती वाढवलेली नाही. मुख्यमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन जलाशयाची उंची वाढवावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

दरम्यान, विजापूर जिल्ह्याचे मंत्री शिवानंद पाटील आणि एम. बी. पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित जपण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपनेही शेतकऱ्यांचे हित धोक्यात आणण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. असं असलं तरी, शेतकरी मात्र आंदोलनासाठी ठाम आहेत. येत्या ३० जून रोजी आलमट्टी धरणाच्या उंचीसाठी भव्य आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आलमट्टी जलाशयाच्या उंचीच्या मागणीसाठी ३० जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात विविध स्वामीजी, कन्नड समर्थक, दलित समर्थक आणि शेतकरी संघटनांचे नेते सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी ३० जून रोजी निडगुंदी येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता लढण्याची वेळ आली आहे, असे आवाहन शेतकरी नेते करत आहेत. एकंदरीत, आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यासाठीचे आंदोलन आता दिवसेंदिवस तीव्र होत असून विजापुरात शेतकऱ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. ३० जून रोजी होणारे हे भव्य आंदोलन धरणाच्या उंचीबाबत योग्य दिशा देणारे ठरेल का? शेतकऱ्यांच्या या मागणीला यश येईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: