पुढील निवडणुकीत दोन लाखांचे मताधिक्य घेऊ : सतीश जारकीहोळी
चिकोडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसला दोन लाख मतांच्या फरकाने विजय मिळेल, अशी आशा होती परंतु आपल्याच लोकांनी पक्षविरोधात काम केल्याने एक लाख मताच्या फरकाने काँग्रेसचा विजय झाला, हा विजय चिक्कोडीतील जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
व्हॉइस : निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, प्रियंका जारकीहोळी यांचा चिक्कोडी मतदारसंघातील विजय हा जनतेचा विजय आहे, आमच्या विरोधकांनी विनाकारण संभ्रम निर्माण केला. मात्र, तरीही जाणकार मतदारांनी काँग्रेसला साथ दिली. आमच्या हमी योजनेचा चांगला परिणाम झाला आहे, काही ठिकाणी हमीभाव योजनेचा फरक दिसून आला नाही तर काही भागात अपेक्षित यश मिळाले नाही, असे जारकीहोळी म्हणाले.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या अथणी या मतदारसंघात आमच्या उमेदवाराला फारशी मते मिळाली नाहीत. अथणीत सुमारे सात हजार मतांचा फरक होता. दोन लाखांहून अधिक मतांनी विजय अपेक्षित होता मात्र कुडची येथील काँग्रेसचे आमदार महेंद्र तमन्नावार यांनी त्यांचे नातेवाईक व अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांच्या बाजूने काम केले आणि याचा परिणाम मतांमध्ये दिसून आला. याबाबत आम्ही हायकमांडकडे तक्रार करणार आहोत. आमच्याच लोकांनी विरोध केल्याने एक लाख मतांचा धक्का बसला. पुढच्या वेळी दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या पराभवाविषयी बोलताना ते म्हणाले, पराभवाच्या मागे अनेक कारणे आहेत. स्थानिक राजकारण, मराठा समाजाची मते, यासह लिंगायत समाजाची मते असा बेळगाव लोकसभा मतदार संघात गोंधळ आहे. यामुळे पराभव झाला असण्याची शक्यता जारकीहोळी यांनी व्यक्त केली. याबाबत आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिक्कोडीमध्ये विजयोत्सवादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, यासंदर्भात पोलीस तपस सुरु आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून देशविरोधी घोषणा देणे हे चुकीचे असून याचा आपण निषेध करतो असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.


Recent Comments