State

मंत्र्यांची दांडी आणि उत्तरांचा अभाव; विधानसभा अध्यक्षांनी सभागृह गुंडाळले

Share

सभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी आणि प्रश्नांना उत्तरं देण्यात सरकारकडून होणारा विलंब, यामुळे विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी संताप व्यक्त करत कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.

विधानसभेच्या कामकाजात आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. सरकारी उत्तरांमधील विलंब आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारवर बोचरी टीका केली. सरकार मृतावस्थेत असून आता त्यांचे अंत्यविधीच उरले आहेत, अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आमदारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला.

गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सभागृहात विचारलेल्या २३० प्रश्नांपैकी ८४ प्रश्नांना लेखी उत्तरे दिल्याचे सांगितले. यावर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आक्षेप घेत ५० टक्के प्रश्नांनाही उत्तरे मिळालेली नाहीत, असे निदर्शनास आणून दिले. गेल्या दोन दिवसांपासून वारंवार सूचना देऊनही कोणीही गांभीर्याने घेत नाहीये, हे सरकार पूर्णपणे निष्क्रीय झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.

सभागृहाचे कामकाज मंत्र्यांसाठी नसून आमदारांच्या समस्या मांडण्यासाठी असते, असे स्पष्ट मत विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी व्यक्त केले. मंत्र्यांच्या वेळेवर न येण्यामुळे आणि प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे सदस्यांचे समाधान होत नाहीये, असे सांगत अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार सूचना देऊनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे, जोपर्यंत संबंधित मंत्री आणि सचिव उपस्थित राहून उत्तरे देत नाहीत, तोपर्यंत कामकाज चालवणे शक्य नाही, असे सांगत त्यांनी सभागृह तहकूब केले.

Tags: