राज्यात सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तीव्र टंचाईचा मुद्दा गाजला. विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत हॉटेल, मंदिरे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवण्याची मागणी केली.

सदस्य आयवान डिसोझा यांनी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेत गॅसअभावी हॉटेल उद्योग आणि मंदिरांमधील प्रसाद व्यवस्था कोलमडल्याचे सांगितले. लाकूड विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत असून रिक्षा चालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, असा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली.
मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने लग्नसमारंभही पुढे ढकलले जात असल्याचे सदस्य एम. नागराज यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गॅसचा काळाबाजार रोखून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि सर्वसामान्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी त्यांनी या चर्चेदरम्यान केली.
यावर उत्तर देताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी इंधन कंपन्यांसोबत बैठक झाल्याचे सांगितले. सध्या दोन जहाजे गॅस घेऊन येत असून आठवडाभरात पुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत वसतिगृहे आणि रुग्णालयांना प्राधान्याने पुरवठा केला जात असून हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments