State

आरोग्य विभागात एक हजार कर्मचाऱ्यांची भरती; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

Share

आरोग्य क्षेत्रातील कामात निमवैद्यकीय कर्मचारी देखील डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहेत. आरोग्य विभागात काम करताना जात-धर्माचे भेद विसरून मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्य विभागातील १ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.


आरोग्य विभागात सेवा देणे हे केवळ करिअर नसून लोकांचे प्राण वाचवण्याचे एक सार्थक कार्य आहे. राज्यात आमचे सरकार आल्यापासून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले जात असून, शिक्षण, आरोग्य आणि पोलीस यांसारख्या महत्त्वाच्या विभागांतील अडीच लाखांहून अधिक पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील. तसेच नियुक्ती आणि बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने समुपदेशन पद्धत राबवली असून, कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला. उपचारावेळी कोणाचीही जात पाहिली जात नाही, त्याचप्रमाणे समाजानेही जात-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करावा आणि आरोग्य विभागाने केवळ उपचारांवरच नव्हे तर रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर द्यावा, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नमूद केले.

Tags: