घरांच्या हस्तांतरण कार्यक्रमात मद्य वाटप केले जात असल्याच्या वृत्तावरून हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार महेश टेंगिनकाई यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे.
हुबळीत माध्यमांशी बोलताना आमदार टेंगिनकाई म्हणाले की, “राज्य सरकार नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे? कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी मद्य वाटप केले जात आहे का? अबकारी विभाग कोणत्या थराला घसरला आहे, हे यातून स्पष्ट होत असून भाजप याचा तीव्र निषेध करते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नाकाखाली हे सर्व सुरू आहे. सरकारचे उत्पन्न घटले आहे म्हणून ते भरून काढण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. अबकारी विभागाने हुबळी रेंज-१ मधील मद्यविक्री दुकानांना अधिक मद्य साठा ठेवून विक्री वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचा नेमका अर्थ काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
घरांच्या कामाचे श्रेय घेण्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “२०೧೭ मध्ये या जमिनी झोपडपट्टी निर्मूलन मंडळाला देण्यात आल्या होत्या. २०१९ मध्ये येडियुरप्पा सरकारने यात सुधारणा केली. आज ज्या घरांचे हस्तांतरण होत आहे, ती सर्व घरे भाजप सरकारच्या काळात बांधून पूर्ण झाली आहेत. तुमचे सरकार आल्यापासून तुम्ही किती नवीन घरे मंजूर केली, याचे उत्तर द्या. केंद्र सरकार प्रत्येक घरासाठी १.५ लाख रुपये देत आहे, हे मान्य करण्याचे सौजन्यही काँग्रेस सरकारने दाखवले नाही,” अशी टीका त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, “या कामाचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून घाईघाईने हा कार्यक्रम उरकला जात आहे. प्रल्हाद जोशी २६ तारखेला येणार होते, तोपर्यंत वाट पाहता आली असती. या अन्यायाविरोधात आम्ही आज आंदोलन करणार आहोत,” असे टेंगिनकाई यांनी स्पष्ट केले.


Recent Comments