विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी शहरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील लक्ष्मीनगरजवळच्या शेताचा बांध फुटून पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना रात्रभर पाण्यातच काढावी लागली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी, योग्य भरपाईच्या मागणीसाठी आंबेडकर चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान, बाधित कुटुंबांनी आपली खराब झालेली घरगुती सामग्री रस्त्यावर आणून प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.
या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार वाय. एस. सोमनकट्टी, जिल्हा नियोजन संचालक, तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन नोडल अधिकारी बी. ए. सौदागर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी एच. एस. चित्तरगी, डीवायएसपी बल्लप्पा नंदगावी आणि पीआय गुरुशांत दाशियाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर, नागरिकांनी निवेदन सादर करून आपले आंदोलन मागे घेतले.
यावेळी नीलू नायक, परशुराम आडगीमनी, हनुमंत कामनकेरी, राजू मुळवाड, रमेश इंगळेश्वर, सिद्धप्पा पैठाण, लक्ष्मण अंबिगेर, श्रीशैल कुंबार, बसवराज जाडर, अनिता अंबिगेर यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Recent Comments