हुबळी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गणेशपेठ बाजारपेठेला सध्या अस्वच्छतेने विळखा घातला आहे. महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गणेशपेठ येथील गणेश मंदिराजवळच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दररोज शेकडो नागरिक या भागात येत असूनही हुबळी-धारवाड महानगरपालिकेकडून कचरा उठाव करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या बेजबाबदारपणामुळे व्यापाऱ्यांना दुर्गंधीतच बसून व्यापार करावा लागत असल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. बाजारपेठेतील ही अस्वच्छता शहराच्या सौंदर्याला बाधा आणत असून नागरिकांना नाक मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ या समस्येची दखल घेऊन स्वच्छता करावी, अशी आग्रही मागणी आता जनतेतून केली जात आहे.


Recent Comments