Belagavi

कोबीला बाजारभाव नसल्याने उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावात कोबीच्या दरात अचानक मोठी घसरण झाल्यामुळे एका हताश शेतकऱ्याने आपले संपूर्ण पीक ट्रॅक्टर फिरवून नष्ट केले आहे. बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याने कोबीची काढणी करणेही परवडत नसल्याने या शेतकऱ्याने हे पाऊल उचलले.

कडोली येथील शेतकरी अप्पासाहेब देसाई यांनी कर्ज काढून आपल्या दोन एकर जमिनीत कोबीची लागवड केली होती. बी-बियाणे, खते आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून त्यांनी हे पीक जोपासले होते. पीक चांगले आल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती, मात्र ऐन विक्रीच्या वेळी दरात मोठी घसरण झाल्याने देसाई कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या मालाला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने कृषी उत्पादनांना हमीभाव द्यावा आणि बाजारपेठेतील किमतीवर नियंत्रण ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असे अप्पासाहेब देसाई यांनी म्हटले.

कोबीची काढणी करून तो बाजारात नेण्यासाठी येणारा खर्चही विक्रीतून निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक विकण्यापेक्षा ते शेतातच गाडून टाकणे योग्य समजून अप्पासाहेब देसाई यांनी संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर चालवला. भाजीपाला पिकांना सरकारकडून कोणताही हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Tags: