राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांत होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असून, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता भाजपवर नाराज असल्याची टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.

वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून, ते काँग्रेसच्या गॅरंटी योजनांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हुबळीमध्ये मंगळवारी माध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत मोठा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात प्रचंड वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊन आमचे उमेदवार विजयी होतील, असे डी. के. शिवकुमार यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रिक्षाचालकांना गॅसऐवजी पेट्रोल वापरण्याचा दिलेल्या सल्ल्यावर डी. के. शिवकुमार यांनी कडक शब्दात टीका केली. इराणवरून एलपीजी घेऊन आलेली दोन जहाजे गुजरातला का पाठवण्यात आली, असा सवाल करत ती मंगळुरू किंवा केरळला पाठवून कर्नाटकला दिलासा का दिला नाही, अशी विचारणा त्यांनी केली. केंद्र सरकार केवळ उत्तर भारताचे हित पाहत असून दक्षिण भारताकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकच्या हितासाठी प्रयत्न करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केली.


Recent Comments