Belagavi

ई-मालमत्ता पत्रासाठी बेळगावमधील उद्योजक आक्रमक

Share

ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेचे उंबरठे झिजवणाऱ्या आणि प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संतापलेल्या बेळगावमधील उद्योजकांनी आज अशोकनगर येथील महानगरपालिका कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

हुबळी-धारवाडपेक्षा बेळगाव महानगरपालिकेचे नियम वेगळे असून ई-मालमत्ता प्रमाणपत्रासाठी जादा पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊनही अधिकारी कार्यालयात फिरकले नाहीत, त्यामुळे आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी संतप्त भावना उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली.

गेल्या ५-६ महिन्यांपासून आम्ही ई-मालमत्तेसाठी पाठपुरावा करत आहोत, मात्र अद्याप काम झालेले नाही. रात्री ११ वाजेपर्यंत आम्ही येथेच थांबून असतो, तरीही दाद मिळत नाही. एजंटमार्फत येणाऱ्यांची कामे तत्काळ होतात, मात्र सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतींना ई-मालमत्ता पत्र देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. यामुळे मालमत्तांची खरेदी-विक्री थांबली असून ५ टक्के करवाढीचा बोजाही नागरिकांवर टाकण्यात आला आहे. अशोकनगर कार्यालयातील अधिकारी जनतेला दाद देत नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत, असा आरोप उद्योजकांनी केला.

ऑटोनगर औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना ई-मालमत्ता मिळण्यास मोठी अडचण येत असून अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. हुबळी-धारवाड महापालिकेच्या धर्तीवर प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन देऊन तसा ठरावही मंजूर झाला आहे, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.

Tags: