चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावामध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या साथीदारांसह एका तरुणीवर आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणीच्या आई-वडिलांसह कुटुंबातील पाच सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.
विद्याश्री किल्लारी असे पीडित तरुणीचे नाव असून बीरप्पा रामप्पा कज्जन्नवर या तरुणाने हा हल्ला केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बीरप्पा हा विद्याश्रीसोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबाकडे तगादा लावत होता. मात्र, विद्याश्रीचे वडील महादेव किल्लारी यांनी आपल्या मुलीचे लग्न बीरप्पाशी लावून देण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणावरून चिडलेल्या बीरप्पाने काल रात्री सुमारे १० जणांच्या टोळीसह महादेव किल्लारी यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला.
हल्लेखोरांनी सुरुवातीला घरातील सदस्यांच्या डोळ्यात तिखट फेकून त्यांना हतबल केले आणि त्यानंतर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चिक्कोडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून लग्नाला नकार दिला म्हणून बीरप्पाने आमच्यावर रॉडने हल्ला केला आणि घरातील सामानाचे नुकसान केले, असे पीडित तरुणी विद्याश्री हिने म्हटले आहे.
हल्लेखोरांनी घरातील सामानाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने अशा प्रकारे कुटुंबावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून चिक्कोडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments