आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता विजापूर शहराला बसू लागला असून, एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस भरण्यासाठी शहरातील गॅस स्टेशनवर रिक्षांच्या लांब रांगा लागल्या असून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.


विजापूर शहरातील जमखंडी रस्त्यावरील गॅस स्टेशनवर रिक्षाचालकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच रिक्षाचालक रांगेत उभे असून तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस पुरवठा अचानक विस्कळीत झाल्याने रिक्षेवर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात गॅस मिळणार की नाही, या भीतीने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत.

गॅसच्या तुटवड्याचा फायदा घेत काही ठिकाणी ९० रुपये दराने गॅसची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत असल्याने सामान्य रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसत आहे. “गॅस मिळाला नाही तर आम्ही आमचा संसार कसा चालवायचा? सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा,” अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाने गॅस स्टेशनवर लक्ष द्यावे आणि काळा बाजार रोखावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Recent Comments