धारवाडमधील जन्नत नगर येथील कचरा डेपोला भीषण आग लागल्याने परिसरात विषारी धुराचे लोट पसरले आहेत. या धुरामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काही दशकांपूर्वी हा कचरा डेपो शहराच्या बाहेर होता, मात्र शहराच्या विस्तारामुळे आता हा प्रकल्प रहिवासी भागाच्या मध्यभागी आला आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने नागरिकांना विषारी हवेत श्वास घ्यावा लागत आहे. येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यागिरी, गांधी नगर, होस यल्लापूर आणि टोल नाका यांसारख्या प्रमुख भागांमध्ये धुराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या गुरुवारपासून या कचरा डेपोला आग लागली असून आजही आगीचे लोळ कायम आहेत, तरीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही आग आणि धूर लगतच्या घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. ही समस्या त्वरित न सुटल्यास महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


Recent Comments