बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका शेतकरी महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेक्कीनकेरे येथील नागनाथ मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी आपली वैरण साठवून ठेवली होती. गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी “येथून वैरण काढा, अन्यथा ती पेटवून देऊ” अशी धमकी दिल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, अंगावर फाटके कपडे असलेल्या अवस्थेतच पीडित महिलेने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काकती पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलीस कोणतीही दखल घेत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
नागनाथ मंदिराची सुमारे साडेतीन एकर जागा असून, स्थानिक शेतकरी अनेक वर्षांपासून तिचा वापर करत आहेत. ६० वर्षांनंतर होणाऱ्या ग्रामदेवता लक्ष्मी देवीच्या जत्रेच्या निमित्ताने ही जागा रिकामी करून देण्यात आली होती. मात्र, लक्ष्मी मंदिर समितीचे अध्यक्ष सावंत ही जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी सांगितले की, राजकीय प्रेरणेतून लक्ष्मी मंदिराच्या नावाखाली दादागिरी केली जात आहे. घरात घुसून महिला आणि वृद्धांना मारहाण करण्यात आली आहे. काकती पोलिसांनी या प्रकरणाकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागे शिवाजीराव बोगान, शिवाजीराव पाटील, जयवंत सावंत, नवनाथ गावडे आणि सुनील गावडे यांचा हात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


Recent Comments