बेळगावात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे नाव बदलून ‘कित्तूर राणी चेन्नम्मा परिवहन’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन दिले.



वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी केंद्रीय बसस्थानकावर हा सोहळा पार पडला. यावेळी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

बेळगाव शहरासाठी १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, सध्या ५ कोटी रुपये खर्चून ११ नवीन बसेस सेवेत दाखल झाल्या आहेत. तसेच २४ वातानुकूलित व विना-वातानुकूलित स्लीपर कोच बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रामलिंगा रेड्डी यांनी दिली.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावला २५० नवीन बसेस देऊन जनतेचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी परिवहन सेवेला ‘ईश्वरी कार्य’ संबोधले आणि भाजपवर टीका करताना सांगितले की, सध्याच्या सरकारने ७,८०० नवीन बसेसची खरेदी केली असून १० हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियेत आहे. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगावच्या हक्काच्या सुविधा मिळवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. यावेळी अपघातरहित सेवा देणाऱ्या ६८ चालकांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले आणि १८८ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.



Recent Comments