State

बागलकोट दंगल प्रकरणी राज्य सरकारवर प्रल्हाद जोशी यांचा घणाघात

Share

बागलकोट येथे शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कलबुर्गी येथे जोरदार टीका केली.

बागलकोट घटनेबाबत बोलताना प्रल्हाद जोशी यांनी पोलीस राजकीय दबावाखाली येऊन एकांगी वागत असल्याचा गंभीर आरोप केला. मशिदीमध्ये शेकडो लोक शस्त्रांसह जमा झाले असतानाही पोलीस शांत राहिले, अशा बातम्यांचा दाखला देत आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा ‘अयोग्यांचे’ ऐकून काम करणे त्यांना शोभत नाही, असा इशारा प्रल्हाद जोशी यांनी दिला. हिंदूंच्या मिरवणुकीवर बंदी घालून एका विशिष्ट समुदायाला संरक्षण देण्याच्या सरकारच्या दुटप्पी धोरणावर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले.

राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींचा सुळसुळाट वाढला असून तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले. दगडफेक करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना परोक्ष पाठिंबा देत असल्याचा आरोप प्रल्हाद जोशी यांनी केला. बागलकोटमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असताना केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Tags: