बडाल अंकलगी येथील वृक्षतोडीप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विनापरवाना चंदनाची झाडे तोडणे अत्यंत गंभीर आहे. तसेच गृहलक्ष्मी योजनेचे दोन हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी जिल्ह्यातील ६०० एकर जमीन निश्चित केली आहे. मात्र, बडाल अंकलगी येथे परवानगीशिवाय झालेली वृक्षतोड चुकीची असून, ही बाब निदर्शनास येताच काम थांबवण्यात आले आहे. महसूल आणि वन विभागाच्या समन्वयाने सरकारी योजनेसाठी केवळ सरकारी जागेचाच वापर केला जात असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, समाजमाध्यमांमुळे हे प्रकार वाढू लागले आहेत. यावर उपाय म्हणून १४ फेब्रुवारीपासून माझ्या मतदारसंघात संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत ‘नो टीव्ही, नो मोबाईल, नो सोशल मीडिया’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बालविवाहाची प्रथा मुळापासून उपटण्यासाठी पालकांनी आणि समाजाने साक्षर होऊन सहकार्य करावे, असे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
गृहलक्ष्मी योजनेबाबत अपडेट देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माहिती दिली की, योजनेचा २६ वा हप्ता वितरित झाला असून आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण ५२ हजार रुपये मिळाले आहेत. रखडलेले दोन महिन्यांचे पैसे आता महिलांच्या बँक खात्यात थेट जमा झाले असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले.


Recent Comments