बेळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून कोणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यास संबंधितावर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने या नव्या निर्णयाची घोषणा केली. जिल्ह्यात दरवर्षी रस्ते अपघातात ८०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. दारू पिऊन वाहन चालवताना अपघात झाल्यास आणि त्यात कोणाचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास आरोपीविरुद्ध ‘बीएनएस’ कलम ११० अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ऊस वाहतुकीच्या पाच महिन्यांच्या हंगामात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे अनिवार्य करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.


Recent Comments