Belagavi

हिप्परगी बॅरेजच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर : जिल्हाधिकारी

Share

कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे हिप्परगी बॅरेजचा दरवाजा निखळल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. यामुळे पाणी वाया जात असल्याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “हिप्परगी बॅरेजच्या दरवाजा क्रमांक २२ चे नुकसान झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे. देखभालीच्या कामादरम्यान काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे ही घटना घडली. यामुळे सुमारे १ टीएमसी पाणी वाहून गेले आहे, मात्र हे पाणी खालच्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी वापरले आहे.”

सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून पुढील १५ तासांत सर्व काही पूर्ववत केले जाईल. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पाटबंधारे विभागाचे तज्ञ घटनास्थळी हजर असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Tags: