Belagavi

भाजपमध्येच गटबाजीचे राजकारण; आरोग्यमंत्र्यांचा भाजपवर पलटवार

Share

आमच्यामध्ये कोणतेही गटबाजीचे राजकारण नाही. भाजपमध्येच पोकळ आणि गटबाजीचे राजकारण आहे. भाजपने प्रथम आपले घर दुरुस्त करावे, असे वक्तव्य आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी केले.

आज बेळगाव येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक सरकारच्या काळात समस्या असतातच. तरीही, आमचे सरकार सर्व शेतकरी आणि त्यांच्या समस्यांना प्रतिसाद देत आहे. केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. ऊस उत्पादक आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकार फसवणूक करत आहे. कुमारस्वामी आणि विरोधी पक्ष केंद्रात मंत्री म्हणून निरुपयोगी ठरत आहेत. केंद्र सरकार राज्यासोबत सपत्नभावाची वागणूक देत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

पुढे दिनेश गुंडूराव म्हणाले की, केंद्र सरकारने मक्याची खरेदी ₹२४०० प्रती क्विंटल दराने करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, त्याची विल्हेवाट शिधावाटप व्यवस्थेत लावण्यासाठी सांगितले आहे. परंतु, आधारभूत किमतीचा एक दमडीचाही निधी केंद्राने दिला नाही. केंद्र सरकारने एमएसपीचा निधी दिला पाहिजे. यावर सभागृहात चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले.

इतकेच नाही तर, आमच्यात कोणतेही गटबाजीचे राजकारण नाही. माध्यमांमध्ये चर्चा झाल्यामुळे आम्ही ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ घेतली. आम्ही हायकमांडच्या निर्देशानुसार काम करत आहोत, त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा गटबाजी नाही. सभागृहात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा होईल तेव्हाच भाजप सरकारने केलेली फसवणूक उघड होईल. अविश्वसाचा ठराव मांडून काहीही साध्य होणार नाही. भाजपमध्येच पोकळ आणि गटबाजीचे राजकारण आहे. भाजपने प्रथम आपले घर दुरुस्त करावे, इतके पुरेसे आहे, असे ते म्हणाले.

Tags: