निपाणी शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने योग्य पाऊले उचलावीत, अन्यथा जागा खाली करावी अशी सक्त ताकीद आमदार शशिकला जोल्ले यांनी पोलीस विभागाला दिली.


शहरात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार जोल्ले यांनी शनिवारी येथील भाजप कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्या म्हणाल्या, “शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत. पोलीस विभाग नेमके काय करत आहे, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. शहरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नाहीत. पोलीस विभाग आणि नगरपालिकेने समन्वय साधून त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.”
सध्या शहरात पार्किंग व्यवस्था सुरळीत नाही आणि मटका जुगार तसेच गांजाच्या वाढत्या सेवनामुळे परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बाबींवर गंभीर लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी. ८ डिसेंबरपासून अधिवेशनाच्या वेळी पोलिसांची नियुक्ती केली जाईल. त्यामुळे शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आवश्यक असल्यास भविष्यात पोलीस दलाची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा. सध्या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावावे, असे निर्देश आमदारांनी दिले.
या बैठकीत चोरीच्या घटना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
यावेळी बैठकीत सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवानंद कारजोळ, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवराज नायिकवाडी, बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनचे पीएसआय रमेश पोवार, स्थानिक श्री हलासिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयवंत भाटले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments