विद्यार्थी हे राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहेत. सध्या नैतिक शिक्षणाच्या अभावामुळे समाजाची दिशा बदलत आहे, म्हणूनच जीवनात संस्कार अत्यंत आवश्यक आहेत, असे मत माजी विधान परिषद सदस्य आणि केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले.


लिंगराज पीयू कॉलेजने आयोजित केलेल्या ‘कैरोस-२५’ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. “आपण कोणत्या पार्श्वभूमीतून आलो यापेक्षा, मिळालेल्या संधीचा उपयोग करून समाजात आदर्श निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात, विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून जिज्ञासू राहिले पाहिजे आणि केएलई संस्थेच्या सुविधांचा लाभ घेऊन आपले जीवन घडवावे.” असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेळगाव शहराचे बीईओ रवी जे. भजंत्री म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व विसरल्यासारखे झाले आहे. पुस्तक हीच खरी शक्ती आहे. सर्व काही पुसले जाऊ शकते, पण ज्ञान नष्ट होत नाही. विद्यार्थ्यांनी मोबाईलचे गुलाम न होता, हातात पुस्तके घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला.
लिंगराज पीयू कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ यांनी मान्यवरांचे स्वागत केले. श्रुस्ती मळघान यांनी आभार मानले. कृषिका मिश्रा आणि सुमीत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी समन्वयक , पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एस. मेलिनमनी यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांतील सुमारे ९५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.


Recent Comments