आजपर्यंत केवळ वाहतूक पोलीस दंडावर ५० टक्के सूट देत होते, ती सूट आता प्रथमच धारवाडच्या प्रादेशिक परिवहन विभागाने देखील जाहीर केली आहे. विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होऊनही दंड न भरलेल्या वाहनधारकांना आरटीओ विभागाने दंड भरण्यासाठी सवलत जाहीर केली आहे.

यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना हुबळी-धारवाडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकांत बडिगेर म्हणाले, हुबळी-धारवाड आरटीओ विभागात २,९४५ प्रकरणे प्रलंबित आहेत. “१९९१ पासून ते २०२० च्या ३१ मार्चपर्यंत असलेल्या प्रकरणांवर आम्ही ५० टक्के सवलत देऊन ती निकाली काढत आहोत,” असे त्यांनी सांगितले. ज्यांच्यावर खटले आहेत, अशा वाहनमालकांना नोटीस देण्यात आली आहे. दंड भरण्यासाठी विभागात स्वतंत्र काउंटरही सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा. सर्व प्रकारच्या वाहनांवर हे खटले आहेत, ज्यात बस, ट्रक, ऑटो आणि बाईकचा समावेश आहे. शासनाच्या आदेशानुसार, केवळ २०२० पर्यंत दंड असलेल्या वाहनांनाच ही सवलत देण्यात आली आहे. हा दंड भरून प्रकरणे निकाली काढण्याची संधी वाहनधारकांना मिळाली आहे. आरटीओ विभागातर्फे अशा प्रकारची सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दंड भरण्याची कोणतीही ऑनलाईन व्यवस्था नाही; तो कार्यालयात येऊनच भरावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments