Vijayapura

नोकरीसाठी लढणाऱ्या तरुणांना आमदार यत्नाळ यांचा पाठिंबा

Share

लाखो सरकारी पदे रिक्त असतानाही भरती प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची वयोमर्यादा संपत चालली आहे. या सरकारी निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या उमेदवारांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. विजापूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनीही आपला पाठिंबा दर्शविला आहे.

सरकारी विभागांतील विविध पदांची भरती तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी विजापूर शहरात मोठे आंदोलन करण्यात आले. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या शेकडो तरुण-तरुणींनी या आंदोलनात भाग घेऊन आपला संताप व्यक्त केला. काँग्रेस सरकारने सत्ता स्वीकारल्यापासून कोणत्याही विभागात पदभरती केली नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र निषेध नोंदवला. अनेक वर्षांपासून नोकरीच्या तयारीसाठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी, सरकारच्या दुर्लक्षामुळे आपली वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आल्याची खंत व्यक्त केली. सरकारने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा आणि वयोमर्यादा वाढवावी, अशी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात सहभागी झालेल्या युवक-युवतींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारने तातडीने या मागणीवर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान, विजापूर शहर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी आंदोलनाचे फोटो शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडले. “रोस्टर पॉईंट धोरण भरतीत लागू करावे, या मागणीसाठी विजापूरमध्ये ३ए, ३बी वर्गातील उमेदवारांनी केलेल्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सरकारच्या अतार्किक धोरणांमुळे या वर्गातील उमेदवारांवर खूप मोठा अन्याय होणार आहे. सरकारने त्वरित दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. याशिवाय, रखडलेल्या भरतीची अधिसूचना त्वरित जाहीर करावी आणि भरती प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकंदरीत, वयोमर्यादा ओलांडत चाललेले नोकरीइच्छुक उमेदवार आता सरकारविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. पात्र असूनही नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ येण्याआधीच सरकारने यावर गांभीर्याने विचार करून आवश्यक ती पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: