ऊस दरावरून केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी धारवाड येथे पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही चिल्लर राजकारण थांबवा आणि एस.एम. कृष्णांसारख्या नेत्यांकडून शिका,’ असा सल्लाही त्यांनी सिद्धरामय्या यांना दिला.

केंद्रावर दोषारोप ठेवल्याबद्दल जोशी म्हणाले की, मुख्यमंत्री दुर्बुद्धीचे आहेत किंवा मूर्ख आहेत. ‘एफआरपी’ आणि ‘एमएसपी’ निश्चित करण्याचा अधिकार केंद्राचा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याने लक्ष दिले नाही, परंतु नऊ दिवसांनंतर बैठक घेऊन केंद्राला जबाबदार धरले, अशी टीका त्यांनी केली. २०१७ मध्ये धोरण बदलल्यानंतर राज्यात ऊस उत्पादकांची थकबाकी फक्त ०.५०% राहिली आहे, तर यूपीएच्या काळात शेतकऱ्यांचे पैसे वर्षानुवर्षे बाकी राहायचे. त्यांनी आरोप केला की ‘राहुल गांधींच्या संगतीमुळे मुख्यमंत्र्यांची अशी अवस्था झाली आहे.’ साखर निर्यात, इथनॉल वाटप यांसारख्या बाबींवरही केंद्राने मदत केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विनाकारण मोदी सरकारवर टीका करणे थांबवावे, असे आवाहन प्रल्हाद जोशी यांनी केले.


Recent Comments