Vijayapura

ऊस दरासाठी विजापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन

Share

प्रति टन ऊसाला ३५०० रुपये दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. इंडि शहरात आज पूर्णपणे बंद पाळण्यात आला, तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

ऊसाला प्रति टन ३५०० रुपये दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी विजापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी, सरकारने त्वरित दर निश्चित करून ऊस गाळप सुरू करावे, अशी मागणी केली. कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी धरणे धरले आणि न्याय्य दर न मिळाल्यास कारखान्यांना ऊस पुरवठा करणार नाही, असा इशारा दिला.

याचदरम्यान, ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी आज इंडि शहरात बंदची हाक देण्यात आली होती. यामुळे शहर पूर्णपणे ठप्प झाले. सरकारी बसगाड्या न चालल्यामुळे बस स्थानकात शुकशुकाट होता. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. बसवेश्वर चौकात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. हिरेबेवनूर गावातील शेतकरी अदृष्यप्पा वालिकार यांनी स्वतःवर चाबूक चालवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांचे हे आंदोलन दिवसेंदिवस वाढत असून, सरकारने त्वरित ऊसाला प्रति टन ३५०० रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: