hubbali

सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री झाल्यास आमचा पाठिंबा असेल: बी. श्रीरामुलू

Share

वाल्मिकी समाजाचे नेते सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री झाल्यास आपला त्यांना पाठिंबा असेल. त्यांनी पक्षात कष्ट केले आहे. जर त्यांना संधी मिळाली आणि ते मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंद होईल, असे मत माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांनी व्यक्त केले आहे.

हुबळी येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, ‘नोव्हेंबर क्रांती’ असे विधान करणारे तुमकूर मतदारसंघाचे आमदार राजण्णा यांच्याकडून काँग्रेस नेत्यांनी राजीनामा घेतला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री म्हणून पुढे कायम राहणार आहेत. खर्गे यांचे पुत्र प्रियांक यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबतही बोलणी झाली आहे. याच कारणामुळे राज्यात ‘भारत माता की जय’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम काँग्रेस करत आहे. तर, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणाऱ्यांना काँग्रेस राज्यसभेवर पाठवत आहे, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला.

प्रियांक खर्गे यांना उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या उद्देशाने काँग्रेस सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन करणाऱ्यांवर विनाकारण कायदेशीर कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यात अघोषित आणीबाणी निर्माण झाली आहे. १९७५ मध्ये इंदिरा गांधी आपल्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करत होत्या, त्याचप्रमाणे आज राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अघोषित आणीबाणी लागू केली आहे. ते द्वेषाचे राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सध्या राज्यात विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला असून, पाच सदस्यांची नियुक्ती होणे बाकी आहे. यासाठी भाजप नेते बैठक घेत आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, याबद्दल भाजप नेते बैठक घेऊन राज्यप्रमुख आणि केंद्रीय नेत्यांना अहवाल सादर करतील. त्यानंतर ते अंतिम यादी तयार करतील, असे त्यांनी सांगितले

Tags: