बेळगाव शहरातील ‘गोवन डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल प्रोड्यूसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’, कामतगल्ली येथील ‘बेळगाव होलसेल व्हेजिटेबल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’ आणि माधव रस्त्यावरील ‘कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सोसायटी’ या तीन संस्थांकडून शेतकऱ्यांच्या ठेवींची फसवणूक झाल्याचा निषेध करत ठेवीदार आणि शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आंदोलन केले.

या संस्थांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. जय किसान खासगी बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ठेवीच्या रकमेचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुलगुंद यांनी यावेळी बोलताना सांगितले, “शेतकरी, जय किसान खासगी बाजारातील व्यापारी आणि क्लार्क यांचे गेली दहा ते पंधरा वर्षांपासूनचे ठेवीचे पैसे परत करण्यासाठी जय किसान खासगी बाजारातील सोसायटी टाळाटाळ करत आहे. या गरीब शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या पैशांची लूट झाली आहे. त्यांचे पैसे प्रामाणिकपणे परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांनी सर्व ठेवीदारांना कोणत्याही प्रकारची चिंता न करण्याचे आवाहन केले.
राजकुमार टोपण्णावर यांनी यावेळी बोलताना सांगितले, “गोवन डिस्ट्रिक्ट व्हेजिटेबल प्रोड्यूसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., बेळगाव होलसेल व्हेजिटेबल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आणि कपिलनाथ क्रेडिट सौहार्द सोसायटी यांनी शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. सर्व ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रे द्यावीत, आम्ही तुमच्या वतीने कायदेशीर लढा देऊ,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या तीनही सोसायट्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, त्यांच्याविरोधात सोमवारी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी आणि ठेवीदारांनी केली.


Recent Comments