हिंदूंच्या आशीर्वादाने मी सुरक्षित आहे. यापूर्वी जे घडले, त्याचा उल्लेख करणे आता योग्य नाही. काँग्रेस सरकारच्या काळातही कोणतीही अडचण आली नाही आणि आताही माझ्या सुरक्षिततेला कोणतीही समस्या नाही, असे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणभाई तोगडिया म्हणाले.

आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राम मंदिर निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट होते. ते कार्य आता पूर्ण झाले आहे. आज कोट्यवधी हिंदूंना मदत करण्याचे काम सुरू झाले आहे. आम्ही हिंदू हेल्पलाइन सुरू केली आहे. हिंदूंना अनेक बाबतीत मदत करण्यासाठी ही हेल्पलाइन आहे. कोणताही हिंदू उपाशी राहू नये, यासाठी आम्ही गरीब हिंदूंना मोफत अन्नधान्य देत आहोत. हिंदूंना मोफत आरोग्य सेवाही देत आहोत.
हिंदू पक्ष सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. त्याला हिंदू राष्ट्र बनवण्याची आवश्यकता नाही. १९४७ पासून भारत प्रगती करत आहे आणि अनेक क्षेत्रांत मोठी कामगिरी केली आहे. भारत स्वतःच महान आहे, त्याला राजकीय पक्षांनी महान करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
आम्ही नावासाठी राम मंदिराचे आंदोलन केले नाही. राम मंदिरासाठी आम्ही आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत. असे झाल्यास आम्ही आंदोलन करू. देशाच्या अनेक भागांत हिंदूंवर हल्ले होत आहेत. यामुळे हिंदूंना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही संघर्ष करू. देशात हिंदू सुरक्षित असले पाहिजेत, असे तोगडिया यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली, पाकिस्तानमध्ये घुसून मारणे उत्तम. आणखी मारले असते तर आपल्या लोकांना अधिक आनंद झाला असता. देशात संततीचा दर (प्रजनन दर) कमी होत आहे. हिंदूंचा प्रजनन दर १.७ इतका आहे, ही संपूर्ण देशासाठी चांगली वाढ नाही. तीन बच्चे हिंदू सच्चे हे आमचे उद्दिष्ट आहे.
Recent Comments