Uncategorized

योगेश गौडा खून प्रकरणी आमदार विनय कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी

Share

भाजप नेते योगेश गौडा खून प्रकरणी काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी आज लोकप्रतिनिधींच्या न्यायालयासमोर हजर झाले असून न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना सीबीआयने ताब्यात घेऊन परप्पन अग्रहार कारागृहात हजर केले. या प्रकरणासंदर्भात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता. धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी, माजी मंत्री विनय कुलकर्णी आज न्यायालयासमोर हजर झाले. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करून, एका आठवड्यात न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर ते लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले, आणि न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. १५ जून २०१६ रोजी धारवाड तालुक्यातील हेब्बळ्ळी मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांची त्यांच्याच मालकीच्या जीममध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये माजी मंत्री आणि सध्याचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांचा हात असल्याचा आरोप होता, आणि त्यांना २०२० च्या ५ नोव्हेंबर रोजी सीबीआयने अटक केली होती. या प्रकरणासंदर्भात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने विनय कुलकर्णी यांचा जामीन रद्द करण्याचे आदेश दिले होते.

अलीकडेच, धारवाड जवळील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन विनय कुलकर्णी यांनी म्हटले होते की, इतकी वर्षे मतदारसंघासाठी केलेले काम आणि दिलेली सेवा लोकांच्या मनात आहे. यामुळेच मी मतदारसंघाबाहेर असूनही आमदार झालो आहे. गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघाबाहेर असूनही लोक मला भेटण्यासाठी उत्सुक असतात. प्रकरणात जामीन रद्द झाल्याने मला अडचणी आल्या असतील, पण मतदारसंघाचा विकास थांबू नये याची मी काळजी घेतली आहे, असे त्यांनी भावुक होऊन सांगितले होते.

न्यायालयात हजर होण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, मतदारसंघाचा विकास थांबू नये आणि मतदारसंघाची उपेक्षा होऊ नये यासाठी मी आधीच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, लोकांची कामे वेळेत आणि विनाकारण विलंब न करता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, माझ्या अनुपस्थितीत माझी पत्नी, मुलगी आणि पक्षाचे नेते मतदारसंघातील सुख-दुःख सांभाळतील. जामीन रद्द झाल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगत, मी अजूनही असहाय्य आहे. पुढील कायदेशीर लढा आमचे वकील लढतील, असे ते म्हणाले होते. यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नी शिवलीला कुलकर्णी देखील भावुक झाल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध सातत्याने पद्धतशीर षड्यंत्र रचले जात असून. त्यासाठी काही लोक पुढे सरसावले आहेत. परंतु हे सर्व काही आपल्यासाठी नवीन नाही, अशाप्रकारे बोलताना त्यांनी देव सर्वकाही ठीक करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Tags: